Type Here to Get Search Results !

बारादरीचे रहस्य : वाकडी चिंच मराठी थरारक कथा -Horror Story in Marathi

बारादारीचे रहस्य: वाकडी चिंच कोकणातील थरारक भयकथा

बारादारीचे रहस्य: वाकडी चिंच (कोकणातील थरारक भयकथा)

विषय: भयकथा | श्रेणी: कोकणातील रहस्यमय कथा

सांजवेळ वेळ झाली होती. पाखरं आपल्या घरट्यात जाऊन विसावली होती. आणि काही पाखरांनी घरट्यात परतण्यासाठी एकचं कलकलाट केलेला होता. प्रत्येक पाखरू घरट्याकडे झेपावतं होत. असंख्य झाडी आणि त्यात वेगवेगळ्या पाखरांची घरटी नदीकाठी जणू पक्षांची दूनियाचं वसलेली होती. थोड्या अंतरावर एक वाकडी चिंच या पाखरांची लगबग जणू आपल्या डोळयांनी निहारत होती. ती अजस्र चिंच कित्येक वर्षांपासून नदीकाठावर अस्तित्वात होती.

ती अजस्र चिंच कित्येक वर्षांपासून नदीकाठावर अस्तित्वात होती. तिचा विस्तार म्हणजे एखादी भयावह राक्षसी दोन्ही हात पसरवून ऊभी आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाला गिळकृत करण्यासाठी आसुसलेली आहे . ह्या चिंचेचं वैशिष्ट्य म्हणजे तिला कधीतरी आजिबात पानं दिसत नसायचे अगदी ओडकी, बोडकी निष्पर्णी होऊन जायची. तर कधीतरी खूप सारी पालवी तिला फुटायची. पण तिची भयानकता तुसभरहीकमी होत नसायची. तिला समस्त गाव वाकडी चिंच म्हणायचा. आणि तिच्या जवळ जाणं म्हणजे हाताने मरण ओढवून घेण्यासारखे आहे.प्रत्येकाच्या मनात भिती पक्की बसलेली होती.

खळखळ वाहणारी नदी आपल्या लयबद्ध आवाजाने वाहत राहायची.या नदीपात्रात "हत्तीटोला दगड "आकाराने अजस्र होता कित्येक वर्षांपासून तो ठाण मांडून बसला होता. काळ्याशार दगडाकडे पाहुन कुणीही विस्मयचकित व्हायचा. हा एवढा मोठा दगड कधी या नदीपात्रातआला असेल कुणालाही माहिती नव्हत. जुनी माणसही या विषयी काही माहिती देऊ शकत नव्हते. खूप पुरातन काळी एखादा महापूर आलेला असावा आणि त्या पुरात हा वाहुन आला असावा एवढाचं कयास माणसे लाऊ शकत होती. नदीच्या पलीकडे गाव वसलेले होते. बारा बलुतेदार वस्ती होती. गावात तसा ऐकोपा होता. पण जशी चांगली तशी वाईट लोकही होतीचं.

चंद्रकला झपझप पाऊले टाकत चालली होती. कधी एकदाची नदी पार करते आणि ती बारादारी पार करून वस्तीत पोहचते असं तिला झालं होतं. डोक्यावर टोपलं होत. आणि पाठीला झोळी करून तिचं बाळ त्यात झोपवलं होतं. जागोजागी ठिगळं असलेली साडी तिच्या गरिबीची ग्वाही देत होती.आज ती शेतात उशिरा गेल्यामुळे तिला मालकाने जास्त वेळ थांबवून राहिलेलं काम करून घेतलेलं होतं. जशी, जशी नदी जवळ येत होती तशी, तशी चंद्रकला घाबरत होती. आजुबाजुला गर्द झाडी आणि त्यातून वाट काढत ती चालली होती.

आता नदी आली निळशारं पाणी खळखळ आवाज करत वाहत होतं हत्तीटोला आपल्या जागेवर अडिग होता. पश्चिमेला ती वाकडी चिंच जणू येणाऱ्या जाणार्‍यावर नजर ठेवून होती. पाण्यात पाय टाकला चद्कलेनं तशी तिची नजर आपसुक वाकड्या चिंचेवर गेली. आणि तिच्या काळजात चर्र झालं. जणू ती चिंच तिच्याकडे पाहुन भेसुर हसत होती. तिचे पाय लटलटा कापायला लागले. तिला तिच्या नवऱ्याची आठवणं आली. घ्यायला आला असता तर बरं झालं असतं. पण दारू पिऊन पडला असेल कुठैतरी त्याला बायको पोराची काय सुद नाय "ती मनात चरफडत होती.आणि एक एक पाऊल टाकत चालली होती. जेमतेम तिने नदी पार केली.

बारादारीची ती भयानक वाट

आता तिला ती टेकडी चढायची होती. ज्या टेकडीला सगळे बारादारी म्हणून ओळखायचे. ही ती भयानक जागा होती. ईथ रात्री काय दिवसाही कुणी फिरकत नसायचं. पण हा जरा जवळचा रस्ता म्हणून चंद्रकला ईकडून यायला निघाली. तिला वाटलं अंधार पडायच्या आधि मी गावात पोहचणार, पण तस झाल नाही. ती नदी पार करायच्या आधि अंधार पडला. एकच पायवाट होती. आणि आजूबाजूला खुरटी झाडी, झुडप यांच साम्राज्य होत. थोड्या, थोड्या अंतरावर झाडे होती. काही छोटी, काही मोठी. टेकडी तशी अवघड वळणाची होती. चढ खूप होता. एक तास लागायचा चढून गावाच्या बाजूला उतरायला.

काळ्याकुट्ट अंधारात ती अंदाजे पाऊले टाकत चालली होती. तेवढ्यात तिचं बाळ रडायला लागलं. एवढ्या गुढ अंधारकटात बाळाचं रडणं तिला भितीदायक वाटू लागलं.आता काय करावं बाळाला तिने पाठीवरून काढल आणि आपल्या दोन्ही हाताने ती त्याला थोपटू लागली. पण बाळ रडायचं थांबत नव्हत. सात, आठ महिने बाळाचं वय होतं. त्याला भुक लागली असेल म्हणुन रडत असेलं चंद्रकलाला कळलं. पण आता या ठिकाणी कस काय त्याला दूध द्याव म्हणून ती आजूबाजूला जागा शोधू लागली. पण तिला अंधारात काही दिसत नव्हत. शेवटी बाळ खूप चिडलं ते जोरजोरात रडू लागल म्हणून ती ज्या जागी होती तिथचं बसली आणि बाळाला दूध पाजू लागली. मनातून ती खूपचं घाबरली होती. ह्या जागेविषयी भरपुर ऐकून होती. कुठली दुर्बुद्धी सुचली आणि आपण या रस्त्यावरून घरी यायला निघालो, तिच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.ती डोळे बंद करून शांत बसली. बाळ दुध पीत होतं....

आणि अचानक ते तिच्यापासून कुणीतरी ओढत आहे असा भास चंद्कलेला झाला. तिने डोळे उघडून पाहीलदोन लालभडक डोळे रोखून तिच्याकडे पाहत होते. बाकि अंधारात काही दिसत नव्हत. त... त.... प... प...करत चंद्रकला त्या डोळ्यांना पाहू लागली. "कोण... ?कोण.... ? मला घरी जायच आहे... !!"मला जाऊद्या...!!" असं म्हणत ती बेशुद्ध पडली.

गावातील घरात सुरू असलेली चर्चा आणि संवाद:

ईकडे चंद्रीची सासु चंद्रा आली नाही म्हणून तिचा तोंडाचा पट्टा चांगलाच सुरू झाला होता.

सासू: "ये... ! रामदास्या कुड उलथली तुझी बायको.... सगळया बायका घरला आल्या ही कुट कलमडली.!! रांधकांड कोण करेन (स्वयंपाक) माझं काय वय राहीलं का आता ,तरुणपणी तेचं आणि म्हातारपणी पण तेचं.! देवबा काय रं माझ्या नशिबात हा वणवा पेटला. म्हातारपणी भाकरतुकडा येळवर मिळेना...!! कुणाचं काय वाकड केल्त बाबा मी अशी सुन मुलं माझ्या निशिबात दिली.!!"

रामदास: "ऐ.... आय.... !गप की कशाला सांजधरला कोकलती आणि माझं टकुर्र फिरवती..!! येयील चंद्री सकाळी तिला येळ झाल्ता मग करत बसली असेल काम....!!"

सासू: "तू चुल पेटीवं ...!आणि काही नाही तरी भात रांधुन ठेव..चंद्री आली का काहीतरी भाजी करेलं !!"

रामदास: "अरे माझ्या कर्मा ,ह्या वयात चुलीजवळ मला काही जमत नाही आणि हा म्हणतो भात रांधून ठेव!! हा.... आता जवानी फुटलीयं मला ....!दहा हत्तीचं बळ अंगात आल माझ्या सगळ करते हं !!"

हत्तीचं नाव ऐकताचं रामदास मनातून चरकला. "आये..... चंद्री बारादारीकडून येत नसल ना..!!" त्याची दारू खाडकन उतरली. "येळ झाला म्हणून ती त्या रस्त्यावर आली असेल आणि अंधार पडला असेल तर...!!"

आता म्हातारी मनातून घाबरलली... "रामदास्या.... उठ लवकर चंद्रीला शोधून आण...!! आणि त्या मोहन पैलवान आणि दोन तीन शहाणी माणस सोबत ने आणि बारादारीत मशाल पेटवून ने बाबा .." रामदास मोहन पैलवानच्या घरी पळाला.

म्हातारीचा आवाज ऐकून शेजारची म्हातारी चौकशी करायला आली...

यशोदा काकी: "काय ग भागी...? काय व कोकलू राहिली. !!"

भागी (सासू): "बाये माझी चंद्री अजून घरला आली नाही..!! आणि मला वाटत ती बारादारीत फसली... आणि भागी बुढी अजून रडू लागली...!!"

यशोदा काकी: "गप ग बाय भागी... येईल चंद्री सुखाची आधिच काय कोकलती....! आणि तू चंद्रीला बोलली नाय का.... ?बारादारीतुन कधी यायचं जायचं नाही... !!"

भागी (सासू): "अव, माय हजारदा सांगितले तिला पर माझं बोलण वंगाळ लागत ऐकून घेत नाही कधीबी... शहाणी आहे चंद्री .....!! आपुन लगीन करून आलो या गावात.... आणि आता वयोस्कर झालो. आज पातूर बारादारीत गेलो नाही.सासुने सांगितले आपण एकलं.... पर ह्या पोरी कसल्या गुर्मित रहात्यात कळत नाय बाय....!!"

रामदास म्हणाला, "ये आये मी चाललो आता मोहन आणि दोन माणस घेऊन बारदारीत तू जरा गप राय... ये यशोदा काकी माय ले संभाळ.... आलोचं मी..." रामदास तरातरा चालत गेला..

क्रमशः...

कथेचे विशेष टिपण:

नमस्कार... 🙏 सदर कथा संपूर्ण काल्पनिक आहे... जिवंत अथवा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही आणि असे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही हॉरर कथा आहे.

© २०२६ | मनतल्या भावना | शेअर करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad