Type Here to Get Search Results !

Heart Touching Marathi Article - खरी श्रीमंती म्हणजे काय? अजय राणेची हृदयस्पर्शी कथा

Heart Touching Marathi Article - खरी श्रीमंती म्हणजे काय? अजय राणेची हृदयस्पर्शी कथा

सुंदर मराठी लेख - वाचून नक्कीच तुमचे मन भरुन येईल...! शक्यतो डोळेही पाणावतील... हा लेख वाचून तो कसं वाटला प्रतिक्रिया नक्की कमेन्ट करा.....अशाच छान छान पोस्ट साठि अपडेट रहा.....
 
emotional-marathi-story
emotioanl-marathi-story


एका शाळेने ठरवले की चालू वर्षापासून शाळेत शिकत असलेल्या सर्वात गरजू मुलाला शाळेकडून आर्थिक मदत द्यायची. त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी चांगली माहिती गोळा करून अचूक मुलगा निवडावा... तरच मदतही योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल...! शिक्षकांसाठी शाळेत सर्वात गरजू विद्यार्थी शोधणे म्हणजेच खूप मोठी अडचण होती. कारण... आता ही लहान मुले सुद्धा इतके छान आणि स्वच्छ राहतात की... मुलांजवळ जरी एकच जोडी कपडे असले
तरीही... त्यालाच दररोज धुवून आणि त्याची प्रेस केल्यासारखी घडी केल्यानंतरच त्याला वापरतात.

मग आता गरजू मुलगा शोधायचा तरी कसा...? आणि प्रत्येकाला विचारायचे तरी कसे कि, तुमच्यात सर्वात गरजू कोणआहे...? 

शिक्षकां समोर खूपच मोठी अडचण होती. चार - पांच दिवस नुसते अंदाज लावण्यातच निघून गेले. मोठ्या वयाच्या माणसांमधे गरजू माणूस शोधणे जितके सोपे आहे, पण... लहान मुलांमधे तितकेच अडचणीचे आहे. एका शिक्षकाने शेवटी जी मुले गाडीनेच शाळेत येत होती आणि गाडीनेच घरी जातहोती अशा तीन - चार मुलांना हाताशी घेतले...
 
जेवणाची सुट्टी झाली आणि शिक्षक ऑफिस कडे निघाले तर बाजूच्या वर्गात काही मुले फळ खातांना  दिसली... शिक्षक वर्गात गेले आणि फळ खाणाऱ्या मुलांना विचारले... " मुलांनो एक मदत कराल का...?  मला आपल्या वर्गातला सर्वात गरजू...?"

एका क्षणाचाही उशीर न लावता... त्या सर्व मुलांनी एकच नाव उच्चारले..." सर आपल्या वर्गातील तो अजय आहे ना...! तो सर्वात गरजू आहे."

मुलांनी एका सेकंदात प्रश्न सोडवला होता. " हे कशावरून म्हणता...? "
" सर. त्याचा शर्ट दोन- तीन ठिकाणी तरी शिवलेला आहे... त्याच्या हाफपेन्टलाही मागून दोन  मोठे ठिगळं लावलेली आहेत... त्याच्या पायात चप्पल राहातच नाही... आता जेवणाच्या सुट्टीत बघा तो कुठेतरी एकटा बसून प्लास्टिकच्या पन्नी मध्ये आणलेली फक्त अर्धी भाकरी खात असेल... आणि सर, ती भाकरीही कालचीच राहते... भाजीही कुठली सर...? गुळाचा लहानसा एक खडा असतो. आम्ही सांगतो... अजयच सर्वात गरजू आहे. शाळेने त्याच मुलाला  मदत द्यायला हवी. "

मुले अगदी एखाद्या वाहत्या पाण्यासारखी सतत पुढे बोलतच राहीली... पण त्या शिक्षकाला ते ऐकू येणे  शक्य नव्हते. कारण त्या शिक्षकांचा अजय आवडता विद्यार्थी होता...! ते अगदी विचारातच पडले... की अजय एवढा गरजू असेल...? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत...? त्याचे अक्षर स्वच्छ 
आणि मोकळे होते. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन त्या शिक्षकांना घडत होते...! एकदा तर त्याची वही त्यांनी आपल्या घरी पत्नीला दाखवायला नेलेली होती आणि म्हणाले होते... 
 
" बघितलेस...! हे सातव्या वर्गाच्या मुलाचे अक्षर आहेत...! असे सुंदर अक्षर असावे हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे..." 

पेपर चे गठ्ठे आणायला अजय धावतच येत असे आणि त्यांच्या आधीच ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा अजयचा उत्साह त्या शिक्षकाला थक्क करून टाकत असे...! शिक्षक अगदी विचारमग्न... असा अजय परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा  मला येऊ नये... या गोष्टीचा मला खूपच दु:ख वाटत आहे... जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना समजते आणि मला त्याची साधीसी कल्पनाही नाही... अरेरे...!

अजय मागील सहलीला आला नव्हता. फक्त शंभर शंभर रुपयेच घेतले होते मुलांकडून... पण अजय चे नाव लिस्टमध्ये नव्हतेच... मी साधा त्याला एक शब्द विचारला ही नाही...! मी खूप कमी पडत आहे...

सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात नाही आलेल्या अजयची मला साधी आठवणही झाली नव्हती. केवळ शंभर रूपये नसल्याने त्याचे रमण सायन्स बघण्याचे राहून गेले. एका चांगल्या अनुभवाला मुकला  होता तो. त्याचा हा आनंद मी हिरावला होता.यादीत अजयचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का 
बोलावले नाही...? अजय स्वत:हून सांगणे तर शक्यच नव्हते... आणि माझ्या व्यस्त दिनक्रमात अजयसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता...!

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो आहे... मुलांनी सुचवलेले नाव बरोबर आहे... आर्थिक मदत, आणि ती पण भरघोस मदत अजयलाल मिळायलाच हवी. आता कसलीही शंका नाहीच... त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. सर्व मुलांनी एका स्वरात सुचवलेले नाव आणि अजयने सहलीला न येणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून... शिक्षकाने मुख्याध्यापकांना  नाव देउन टाकले...  अजय राणे... वर्ग सातवा (अ) अनुक्रमांक पंचेचाळीस....

आदरणीय मुख्याध्यापक नाव वाचून म्हणाले, " चांगली खात्री केली आहे ना सर...? कारण  लहानशी रक्कम नाही आहे... या विद्यार्थ्याची पूर्ण वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य,  गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."

मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने ते म्हणाले... " सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातील सर्वात गरीब आणि हवे तर आदर्शही म्हणा तर... अजय राणेच आहे...!"

एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन ते निघालो. अजयला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकदृष्ट्या चांगले होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पना चित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते त्यांना कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी शिक्षक शाळेत लवकरच गेले.. शाळेतील चांगल्या अक्षरांचे सर म्हणून प्रसिद्ध... भोयर सरांनी खूपच चांगल्याप्रकारे फ़ळा सजवला होता. त्यावर ' गरजू असूनही आदर्श ' असे म्हणून अजयचे नाव होते... शाळा भरली... आणि ते भोयर सर ऑफिसमध्ये बसलेले होते... अचानकपणे त्यांचे लक्ष ऑफिसच्या दाराजवळ उभा असलेल्या अजय कडे जाते... 

अजयच्या चेहऱ्यावर न समजणारे भाव.... राग आवरावा तसा चेहरा... " सर, रागवू नका... पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." अरे, काय बोलतोयस तुला समजते का...?" चुकतही असेन मी... वाट्टेल ती आपण मला शिक्षा करा... पण सर ते नाव...!

त्याच्या डोळ्यातलं पाणी... आवळलेल्या मुठी... घशातला आवंढा... सरांना काहीच समजत नव्हते...   मी ज्याचे अभिनंदन करायच्या तयारीत एवढा आनंदी आणि उत्सुक आहे... तो असा...?

" मला मदत कशासाठी सर...?
गरजू आहे म्हणून...? पण मी तर संपन्न आहे."
चप्पल नसलेले त्याचे ते लहान पाय...  रफ़ू केलेला कालर सरांच्या नजरेतून सुटत नव्हताच...  शाळेच्या चौदा वर्षाच्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच भोयर सर कडे आली होती.
" अरे पण...? "                                               
" सर... भरवसा ठेवा... मी संपन्न आहे... कदाचित सर्वातही संपन्न असेन..! सर... मी गरजू आहे हे  ठरवले कोणी...? मी बोलतांना चुकत आहे हे मला कळत आहे... पण सर... जर का ते नाव तसेच राहिले तर मी आज नक्कीच आजारी पडेन...!

बोलता बोलता अजय सरांच्या जवळ आला आणि त्याने भोयर सरांचे पायच धरले. अजय ला उठवत...सर म्हणाले... " ठीक आहे. तुला ती मदत नको आहे ना.... बर... नको घेऊस... पण तू संपन्न  आहेस... ते कसे काय...?"

" सर... आपण माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा... सगळ्याच विषयांच्या... त्या पूर्ण आहेत. हा.. हे खरे आहे की मी पुस्तके जुनी वापरतो...! पण सर नवीन पुस्तक आणि मागीलवर्षीच्या  पुस्तकातील मजकूर तर तोच असतो ना...? मी आपल्या मनात काय उतरवतो ते महत्वाचे  नाही का...? सर, माझे पाचवी पासूनची टक्केवारी बघा... नेहमी पहिल्या तीन मध्येच असतो. मागीलवर्षी खेळा पासून तर निबंधा पर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर...सर,सांगा ना... मी गरजू कसा...?"

अजय सरांनाच विचारत होता... आता तर सरांच्या दु:खाचे पाणी विरून त्यात... अजयच्या भविष्याचे  स्वप्न थरारत होते...!
" खरे आहे अजय.. पण तुला या पैशाने मदतच... "
" मदत कसली सर...? उलट माझी कष्ट करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर..मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाने बंद करेन...! "

" म्हणजे...? "
" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. ठेकेदार बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला  त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी जमा करतो... सर, संचयिका आहे ना शाळेची,  त्यातले माझे पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले वाटते... म्हणूनच तुम्ही मला निवडलेले वाटते. पण सर... मीच नाही तर आमचे घरचेही सर्व संपन्न आहे. घरातले सगळे काम करतात. काम म्हणजे कष्ट...! 

जेव्हा रंगाचे काम नसते  तेव्हा बाबा बस वर हमालीही करतात. आई धुणे - भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच  नाही... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तके मीच सर्वात जास्त वाचली आहेत. 

तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही मी पत्र पाठवतो . सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे व.पु. काळे यांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे...
सर, आहे ना मी संपन्न...? "

आता तर तो हास्य रेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही  शिकलो. रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात...!  ऐकतांना भान हरपून जाते..."

त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. आश्चर्यकारकपणे सरांनी विचारले...
" व्यायामशाळेतही जातोस...? "
" सर... तेवढा रिकामपण कुठला...? घरातच रोज बारा सूर्यनमस्कार आणि तीस बैठका काढतो. "
सरांच्या अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.
" अजय मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा... "
" म्हणूनच म्हणतो सर...! "
" हे नाव ज्या कारणासाठी आहे... त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली, पण... 
याचे रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून... 
हे पारितोषीक तरी..."

" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचले, हेलन केलरचे, महात्मा फुले यांचे चरित्र वाचले. सर, हे वाचले की कळते की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. 

माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा, पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचे राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"

वाचनाने... स्पर्धांतल्या सहभागाने... कलेच्या स्पर्शाने... कष्टाने... त्याच्या वाणीला व्यावहारिकतेची  खोली होती... संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा अजय राणे स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.

शाळेतला सर्वात संपन्न मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू  पाडणारा...! संपन्न...!

धन्यवाद.....
 

निष्कर्ष (Conclusion)

खरी गरिबी म्हणजे पैशांचा अभाव नाही,
आणि खरी श्रीमंती म्हणजे केवळ पैसा नाही.
खरी श्रीमंती म्हणजे –
कष्ट करण्याची तयारी,
स्वाभिमान,
आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द.
ही कथा प्रत्येक पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्याने वाचायलाच हवी.


✍️ तुमचं मत नक्की सांगा

हा लेख वाचून तुम्हाला कसं वाटलं?
प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा.
अशाच हृदयस्पर्शी मराठी लेखांसाठी अपडेट राहा 🙏

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad